नाटकाने मुलांची करमणूक केल्यावर मुले नाटकाकडे येतील – सुबोध भावे

मुंबई : ‘मला वडिलांनी सहावीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलं. यामुळे माझा बालनाट्याशी संबंध आला. आपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहे. गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले की, बालनाट्याची परंपरा संपली आहे. लहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाही, मालिका नाही, काही नाही आहे. आपण मुलांसाठी काही करत नाही. समाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाही. ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. पुण्यात मुलांना खेळायचे असेल, तर दुर्दैवाने मैदान नाही. इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते. उत्तम बाग नाही, जिथे मुले खेळू शकतात. मुलांनी खेळायचे नाही, असे आपण ठरवले आहे. कोरोनाच्या काळात आपण मुलांना मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातले. आता ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड गोष्ट झाली आहे. मी लहानपणी जी बाल नाटके पाहिली, त्याची छबी आजही मनावर ताजी आहे. आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेत. जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील. आपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टाहास आहे, तो नाटकातून बाजूला व्हायला हवा. मुलांना एक सकस मनोरंजन पाहिजे. जेव्हा त्यांना कळेल की हे नाटक मला आनंद देत आहे. घरी आई – बाबा शहाणपणा शिकवतात, शाळेत शिक्षक शहाणपणा शिकवतात, परत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहे. नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे. नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे, हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा मुले नाटकाकडे येतील.’ असे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी सांगितले. बेळगांवमध्ये मुंबईच्या बालरंगभूमी अभियानाद्वारे पहिले बालनाट्य संमेलनाचे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ आज संपन्न झाला. यावेळी अभिनेते प्रसाद पंडित, बालनाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मीना नाईक, उद्धघाटक सई लोकूर, बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर, अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अभियानाचे सचिव देवदत्त पाठक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगावच्या अध्यक्षा संध्या देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बेळगांवच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यशाळांमध्ये मुंबई, बेळगांव, कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळांमध्ये बेळगांवमधील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ६०- ६० विद्यार्थ्यांचे गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केली.

या कार्यशाळेत देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी कार्यशाळेत मुद्राअभिनय, संघर्ष, कथानकाचं बीज, कथानक, कथानक आणि उपकथानकाची जोडणी, खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली. ती कौशल्ये देहबोली, संवाद, विसंगती, अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली. सभोवतालची माणसे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे, आदी स्वत:च्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावा, हे ही कार्यशाळेत सांगण्यात आलं. यातील मुलांशी पत्रकार शीतल करदेकर, प्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला.

दुसऱ्या गटाचे संचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर जितेंद्र रेडकर, ओम कृष्णजी यांनी त्यांना मदत केली.राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतले. या मुलांशी पत्रकार कपिल प्रभू, अतुल कुलकर्णी, साप्ताहिक ‘मार्मिक’चे उपसंपादक नितीन फणसे आणि राम कोंडीलकर यांनी संवाद साधला. नाटकात काय करणे अपेक्षित आहे हे शिक्षकांनी आज शिकवल्याचे मुलांनी सांगितले. खेळातून एकाग्रता करायला शिकल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

तसेच शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते यांनी घेतली. शिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद – वाचक अभिनय, भूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले.

गट क्रमांक तीनमधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केली. यातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकर, युवराज अवसरमल, योगेश घाग, अभिजित जाधव यांनी संवाद साधला. गट क्रमांक चारचे नेतृत्व नयना डोळस, लीला हडप यांनी केले, तर नीता कुलकर्णी, अर्चना ताम्हनकर यांनी त्यांना मदत केली.

तसेच शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा एन एस डी मधून शिकलेल्या संध्या रायते यांनी घेतली. त्यांनी शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन केले. त्यांना मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळले. यात सहभागी झालेल्या शिक्षक व पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे, दै. ‘नवराष्ट्र’चे संपादक नरेंद्र कोठेकर आणि सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. तसेच भरत मोरे, मयुरी मोहिते, नयना डोळस, लीला हडप आदी तज्ज्ञांनी आणि पत्रकारांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बालनाट्य विषयक आणि भविष्यकालीन कारकिर्दीसाठी मार्गदर्शन केलं.

दरम्यान’शिरगांव हायस्कुल’, शिरगांव यांच्या विद्यार्थ्यांनी ‘धरतरी’, नाट्यसंस्कार कला अकादमी, पुणे यांनी ‘जीर्णोद्धार’, ‘रंगभूमी अभियान’, तळेगांव ‘माझी माय’ ही बालनाट्ये सादर करण्यात आली. यावेळी अभिनेते प्रसाद पंडित उपस्थित होते. मुंबईच्या बालरंगभूमी अभियान संस्थेतर्फे ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य लाभले.

दुपारी ‘मुंबई चौफेर’चे संपादक प्रफुल्ल फडके आणि दै. ‘वृत्तमानस’च्या पत्रकार शीतल करदेकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतली, तर अभिनेत्री सई लोकुर आणि तिची आई वीणा लोकुर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनित मासावकर आणि कपिल प्रभु यांनी घेतली.