‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेचा रंगणार ‘सुफळ संपूर्ण’ विशेष भाग

मुंबई:कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिका आघाडीवर होत्या. रमा-राघव, अर्जुन-सावी या जोड्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकांनी तरुणाईचा प्रेमाचा गंध महाराष्ट्रभर पसरवला. पण आता ‘सुफळ संपूर्ण’ विशेष भागाद्वारे या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

परांजपे उद्योग समूहाची सीईओ होण्याचे स्वप्न बाळगणारी संस्कारांचा दूर दूरचा संबंध नसलेली उद्धट रमा ते आता संस्कारांचा श्रीगणेशा करणाऱ्या वैदिक शाळेच्या उपक्रमाची सुरुवात करणारी रमा, आदर्श मुलगी, आदर्श सून,आदर्श पत्नी हा रमाचा, समंजस जोडीदार राघवच्या साथीने घडलेला प्रवास प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. या लाडक्या ‘रमा राघव’च्या मालिकेची गोष्ट पूर्ण होताना, रमाचे सीईओ होण्याचे स्वप्न पूर्ण होणार का? स्वार्थासाठी रमाचा वापर करणाऱ्या रमाच्या आईचे काय होणार? या प्रश्नांची अनोखी उत्तरे मिळतानाच, त्यांच्या आजवरच्या प्रेमाची लोभस गोष्ट प्रेक्षकांच्या मनात कायम स्वरुपी घर करेल अशा आठवणीने पूर्ण होईल. त्यामुळेच ‘रमा राघव’ मालिकेचा हा ‘सुफळ संपूर्ण’ विशेष भाग संस्मरणीय ठरणार आहे.

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत सावी आणि अर्जुन या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा जिथे गैरसमजाच्या निखारानेच कसा पेटवला ‘पिरतीचा वनवा’ हे पाहायला मिळालं. आता ‘सुफळ संपूर्ण’ विशेष भागात विद्याधर गुन्हेगावर असल्याचं सर्वांसमोर येणार आहे. तर दुसरीकडे सावी बाच्याचं प्रेम स्वीकारणार आहे.

‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकांचा ‘सुफळ संपूर्ण’ विशेष भाग प्रेक्षकांना शनिवारी २७ जुलैला रात्री ९:३० आणि १०:०० वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर पाहता येईल. या दोन मालिकांची जागा आता बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व घेणार आहे.