अक्षता म्हात्रेच्या हत्याऱ्यांचे वकीलपत्र न घेण्याची विनंती

‘आगरी कोळी समाज चॅरिटेबल ट्रस्ट’चे ठाणे जिल्हा वकील संघटनेला निवेदन

नवी मुंबई: अक्षता म्हात्रे या बेलापूरस्थित विवाहितेची शिळ-डायघर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या गणेश घोळ मंदिरात करण्यात आलेली हत्या ही माणूसकीलाच काळीमा फासणारी असल्याने या प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपींना मरेपर्यंत फाशीच व्हायला पाहिजे. म्हणून ठाणे न्यायालयात चालणाऱ्या या खटल्यात या घटनेतील आरोपींचे वकीलपत्र येथील कोणत्याच वकील बांधवाने घेऊ नये अशी मागणी आगरी कोळी समाज चॅरिटेबल ट्रस्टने एका निवेदनाद्वारे केली आहे.

या नराधमांना फाशीच व्हायला हवे व त्यामधून समाजात एक संदेश गेल्यास पुन्हा कुणी नराधम असे अमानवी कृत्य करण्यास धजावणार नाही, यासाठी सदर आरोपींचे वकीलपत्र न घेऊन ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या सदस्य वकीलांनी योग्य ते सहकार्य करावे अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.