’नाम फाऊंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
पुणे: “जे जे जगी जगते तया, माझे म्हणा, करुणाकरा” या भावनेशी प्रामाणिक राहून ‘नाम फाऊंडेशन’ ही नामांकित संस्था गेली १० वर्षे पर्यावरण आणि विविध शाश्वत विकास क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत आहे. संस्थेचा दशकपूर्ती समारंभ नुकताच पुण्यात उत्साहात संपन्न झाला. पालखी नृत्याने तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत या सोहळ्याची सुरुवात झाली.
नाम फाऊंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या स्नेहमेळाव्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्या या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेत सामाजिक कामासाठी पुढाकार घेतला तर ही सामाजिक चळवळ नक्कीच समाजात, देशात बदल घडवू शकते’, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. समस्यांचे रूपांतर संधीत करणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असायला हवे, असे सांगताना चांगल्या सामाजिक कार्यासाठी राजकीय प्रचाराची गरज नसते त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असे सांगताना ‘नाम’ने केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. ‘देणारे हात होण्यापेक्षा मदत करणारे हात होता आलं पाहिजे’. जेवढ्या जास्त प्रमाणात आपण स्किल निर्माण करू तेवढे आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहू त्यासाठी समाजासाठी संवेदनशील असणाऱ्या प्रत्येकाने आपला खारीचा वाटा आवर्जून उचलायला हवा, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.
असे विविध प्रयोग वेगवेगळ्या माध्यमांतून होणे महत्त्वाचे असून या प्रयोगांना सरकारी साखळीत सामावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. महिला वर्गासाठी ५ ते ६ तासांचे ‘वर्क मॉड्युल’ तयार करत अधिकाधिक महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखविली.
‘नाम’ या संस्थेचे कामच त्यांच्या यशाची पावती आहे. अशा संस्थांचा नावलौकिक सर्वत्र व्हावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. शासनसोबतही अनेक कार्यक्रमांतून- योजनांतून आम्ही ‘नाम’ संस्थेला समाविष्ट केले असून याअंतर्गत अनेक चांगली कामे आजवर झाली आहेत. ज्याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
सप्टेंबर २०१५ साली ‘नाम फाऊंडेशनची’ स्थापना झाली आणि आज फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. या वाटचालीत आजवर असंख्य हातांनी माणूसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले. मानवतेचा हा यज्ञ यापुढेही असाच अखंडपणे चालत राहील, यासाठी ‘नाम फाऊंडेशन’ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ‘नाम’ चे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर आणि संस्थापक सचिव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी केले.