आशय कुलकर्णीने ‘सुख कळले’च्या चित्रीकरणादरम्यान मक्याच्या कणसावर मारला ताव

मुंबई:धो धो पडणारा मुसळधार पाऊस, हुडहुड भरवणारी थंड हवा आणि मीठ, तिखट आणि सोबतीला लिंबूरस लावलेलं खरपूस भाजलेलं मक्याचं कणीस. क्या बात है… नुसतं नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं ना… पावसाळ्यात गरमा गरम मक्याचं कणीस खाण्याची मजाच न्यारी आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारणाऱ्या आशय कुलकर्णीने सेटवरच मक्याच्या कणसावर ताव मारला आहे.

आशय कुलकर्णी म्हणतो,”पु. ल. देशपांडे यांच्या “असा मी असामी” या पुस्तकातलं हे एक अत्यंत मजेदार आणि विचारप्रवण वाक्य आहे. त्यामध्ये ते लिहितात, “रस्त्यावरून वरात जात असेल आणि आपण थांबून बँड न ऐकण्याचं आपलं वय नाही असं वाटल्यास, आपलं बालपण संपलं असं समजावं,”असं मला अनेक गोष्टींबद्दल वाटतं. त्यातलं एक म्हणजे पावसाळ्यात रस्त्याकडेला लागलेल्या हातगाडीवर हातात पु्ष्ठा घेऊन घमेल्यातल्या कोळशाला वारं घालंत त्यावर भाजलं जाणारं मक्याचं कणीस.. गाडी लगेच बाजूला घेऊन न खाणं म्हणजेपण बालपण संपलं. कारण माझ्या लहाणपणी दर पावसाळ्यात सिंहगडावर जाणं, तिथे खडकवासल्याजवळं हातगाडीवरचं गरम गरम कणीस खायचो”.

आशय पुढे म्हणतो,”आता सिंहगडाजवळ जाणं शक्य होत नसलं तरी पावसाळ्यात गरम कणीस खाणं मी विसरत नाही. माझ्यातलं बालपण अशा छोट्या गोष्टींमधून जपण्याचा प्रयत्न करतो. जसं गरम गरम कणसाला, मीठ, लिंबू, तिखटाशिवाय अर्थ नाही, तसं आपल्या आयुष्यात पावसाळ्यात गरम गरम भाजलेलं कणीस न खाता येणं म्हणजे पावसाळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे ‘सुख कळले’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान मीदेखील भाजलेलं कणीस खाण्याचा आनंद घेतला”.