मुंबई: महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एमएनएलयू) मुंबई येथील सार्वजनिक कायदा, धोरण आणि न्यायशास्त्र संशोधन केंद्राने (सीआरपीएलपीजे), श्रीलंका येथील कोलंबो विद्यापीठाच्या पर्यावरण कायदा आणि धोरण केंद्राच्या सहकार्याने “घटनावादापासून परिवर्तनवादी घटनावादापर्यंत: काळ आणि जगाच्या संदर्भात संविधानांचा पुनर्विचार” या विषयाची दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या नुकतीच संपन्न झाली. आधुनिक युगात घटनात्मक तत्त्वांच्या व्यावहारिक उपयोगावर उच्चस्तरीय शैक्षणिक चर्चा आणि चिकित्सक चिंतनाने ही परिषद गाजली.
एमएनएलयू मुंबईचे कुलसचिव प्रा.(डॉ.) प्रकाश चौधरी यांनी स्वागतपर भाषण देऊन परिषदेची सुरुवात केली. कोलंबो विद्यापीठाच्या प्रा. (डॉ.) कोकिला कोनासिंगे यांनी आपल्या मुख्य भाषणात भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचा विशेष संदर्भ देऊन तुलनात्मक परिवर्तनवादी घटनावादावर भर दिला. एमएनएलयू मुंबईचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तुलनात्मक घटनावादाचा विस्तृत आढावा सादर करून परिषदेचा आत्मा मांडला आणि बदलत्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध राष्ट्रांनी आपल्या राज्यघटनांची रचना कशी केली आहे याचे विश्लेषण केले.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून शोभा वाढवली. यावेळी त्यांनी अनियंत्रित सत्तेवर मर्यादा घालणारा घटनावाद हा त्याचा गाभा आहे यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी मूलभूत कर्तव्यांवर जोरदार भर दिला आणि नागरिकांचे हक्क त्यांच्या जबाबदाऱ्यांशी संतुलित असले पाहिजेत असा युक्तिवाद केला.
उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पंकज मिथल होते. त्यांनी ‘धर्म’ (Dharma) प्राचीन संकल्पना आणि आधुनिक संविधान यांच्यातील साम्यस्थळे स्पष्ट करणारे एक मार्मिक भाषण दिले. ते म्हणाले, “संविधान ही ‘धर्मा’ची आधुनिक अभिव्यक्ती आहे, जे कर्तव्य, कायद्याचे राज्य आणि लोकांचे संरक्षण यांचे समर्थन करते.”
एमएनएलयू मुंबईचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रतापसिंह साळुंके यांनी आभार प्रदर्शन करून उद्घाटन समारंभाची सांगता केली. एमएनएलयू मुंबई येथील सहायक प्राध्यापिका डॉ. संपदा कांगणे आणि डॉ. सायली सुरजुसे या सार्वजनिक कायदा, धोरण आणि न्यायशास्त्र संशोधन केंद्राच्या सदस्या असून, त्या या परिषदेच्या प्राध्यापक संयोजक आहेत.ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, यामध्ये जगभरातून सहभागी आले आहेत. या परिषदेचा समारोप १९ एप्रिल २०२६ रोजी अंतिम सत्राने करण्यात आला.