‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान !

मुंबई: ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांना ‘आयसीटी’ मुंबई (पूर्वीचे UDCT) आणि ‘द कलर सोसायटी’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या ‘जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. सदानंद कुंदर यांना ‘पेंट’ उद्योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी हा पुरस्कार जे.बी. जोशी, पद्मभूषण आणि आयसीटीचे माजी संचालक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौजन्य कलरच्या संचालिका प्रिया भूमकर, उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे सीईओ हरी कुमार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

‘पेंट’ (रंग) निर्मिती उद्योग क्षेत्रातील महनीय व्यक्तिंना त्यांच्या अद्वितीय कार्याची दखल म्हणून हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यापूर्वी एशियन पेंट्सचे अश्वीन दाणी, कॅम्लिनचे सुभाष दांडेकर आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सदानंद कुंदर यांच्या पेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानांबद्दल त्यांना हा विशेष प्रेरणादायी ‘जीवनगौरव पुरस्कार’ बहाल करण्यात आला आहे. सदानंद कुंदर हे पेंट उत्पादन क्षेत्रात गेली ४० वर्षे धडाडीने कार्यरत असून त्यांचे पेंट निर्मिती, जहाजबांधणीसाठी पेंट कॉन्ट्रॅक्टिंग आणि ओएनजीसी (ONGC) या क्षेत्रांमध्ये मध्ये मोलाचे योगदान आहे. १९८१ मध्ये वयाच्या साडेअठराव्या वर्षी, घरच्या आर्थिक अडचणींमुळे सदानंद कुंदर उडुपीहून मुंबईत आले आणि त्यांनी अवघ्या ९/- रुपये रोजंदारीवर कनिष्ठ पेंट पर्यवेक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. १९८४ मध्ये स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून घोडबंदर, ठाणे येथील शिपयार्ड कंपनीचे पहिले कंत्राट मिळविण्यात ते यशस्वी झाले. तेव्हापासून गेली चार दशके पेंट उद्योग क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले असून त्यांची घोडदौड अविरत सुरु आहे. माझगाव डॉक लिमिटेड, एल अँड टी, चौगुले ग्रुप, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाते.

पुरस्कार मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त करताना, सदानंद कुंदर म्हणाले ‘पेंट उत्पादन क्षेत्रात मी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी ऋणी आहे. नव्या भारताच्या विकासात भरीव योगदान देण्याऱ्या तरुण उद्योजकांसाठी माझा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल, त्यातून भावी प्रतिभावंत उद्योजक या क्षेत्राला लाभतील अशी मला अशा आहे.’