दादरमध्ये २८ मे २०२३ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीला एकवटणार सावरकरप्रेमी राष्ट्रभक्तांची शक्ती!

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन दिनांक २१ मे ते २८ मे दरम्यान करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी दिनांक २८ मेला दादर येथे भव्य पदयात्रा आणि प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुंबई आणि लगतच्या महानगरांतील हजारो सावरकरप्रेमी राष्ट्रभक्तांची शक्ती दादरमध्ये एकवटणार आहे.

‘वीरभूमी परिक्रमा’ आणि ‘सावरकर विचार जागरण सप्ताह’
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य लाभलेल्या महाराष्ट्रातील ठिकाणांचे जसे की सावरकरांचे जन्मस्थान भगूर, नाशिक, पुणे, सांगली, रत्नागिरी आणि मुंबई येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करत ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर टुरिझम सर्किट’ निर्मितीचा संकल्प राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच घोषित केला होता. तसेच, या सर्किटला ‘वीरभूमी परिक्रमा’ असे नावही देण्यात आले होते. तसेच सावरकरांच्या जीवनकार्याला अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठाच्या माध्यमातून ‘विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत दिनांक २१ ते २८ मे दरम्यान उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी मिळून तब्बल ४० हून अधिक कार्यक्रम संपन्न होत असून त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

राज्याचा पर्यटन विभाग, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आदींसह मुंबई आणि लगतच्या महानगरांतील राष्ट्रीय विचारधारेच्या संस्था-संघटना, सांस्कृतिक-धार्मिक संस्था-संघटना, शैक्षणिक संस्था, नागरिक-कार्यकर्ते यांची उपस्थिती असेल.

या अभिनव उपक्रमामध्ये दिनांक २८ मेला सायंकाळी ६.३० वाजता दादर येथील सावरकर सदन ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अशी भव्य पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ पदयात्रा येऊन तिथे सावरकरांना मानवंदना देण्यात येईल. तसेच तिथे सावरकर लिखित ‘जयोस्तुते’ गीताच्या सामूहिक गायनाने पदयात्रेची सांगता होईल.

या पदयात्रेला यशस्वी करण्याकरिता पर्यटन विभागासह स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, विवेक व्यासपीठ आणि इतर अनेक राष्ट्रीय विचाराच्या संस्था-संघटनांतर्फे गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात जनसंपर्क सुरू आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार यांसह अनेक ठिकाणांहून मोठ्या संख्येने या पदयात्रेसाठी राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत.

दादर येथे बालमोहन विद्यामंदिरजवळ असलेले सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्यांच्या अखेरच्या काळात अनेक वर्षे वास्तव्य होते. तसेच याच ठिकाणी त्यांनी आत्मार्पण केले. त्यामुळे या ऐतिहासिक स्थानाचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्व मोठे आहे. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचार आणि जीवनकार्याच्या प्रचार-प्रसारासाठी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यामुळे या दोन स्थानांदरम्यानची ही पदयात्रा अनेकार्थाने महत्वाची आहे. तसेच वीरभूमी परिक्रमा आणि सावरकर विचार जागरण सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारे प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्याचा इतक्या व्यापक स्तरावर गौरव होत असून यासाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठाने पुढाकार घेतला आहे. यामुळे राज्यातील वातावरण ‘सावरकरमय’ होत असल्याने राज्यातील तमाम सावरकरप्रेमी नागरिक, संस्था-संघटनांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाची भावना व्यक्त होत आहे.