छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ !

छत्रपती संभाजी नगर: ‘संभाजी नगरमध्ये अनेकदा आलो, गेल्या वर्षी आलो तेव्हा मुख्यमंत्री होतो, प्रत्येकवेळी गर्दीचा महापूर. आज अभिमानाने आणि समाधानाने आलो. १९८८ साली याच शहराने शिवसेनेच्या ताब्यात महानगरपालिका दिली. शिवसेनाप्रमुखांनी दंडवत घालून छत्रपती संभाजीनगर हे नाव करणार असे वचन दिले. दोन वेळा केंद्रात आणि राज्यात आपण भाजप सोबत होतो पण छत्रपती संभाजीनगर केले नाही ते काम महाविकास आघाडीने करुन दाखवले. यावरून त्यांची वृत्ती दिसते, ‘असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वज्रमूठ सभेत म्हणाले. ‘वज्रमूठ’ महाविकास आघाडी सभेच्या व्यासपीठावर भारत मातेचे आणि घटनेचे पूजन करण्यात आले. अंधार फार झाला… या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, पोवाडयाचे सादरीकरण करण्यात आले.

‘सावरकर गौरव यात्रा जरुर काढा. आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेना भवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढावी लागते. मालेगावात सभा झाली. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप. मला एक उदाहरण द्या, मी पुन्हा तोंड दाखवणार नाही. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेस सोबत गेलो, तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत गेल्यावर तुम्ही काय सोडले. तुम्ही म्हणाल तेच खर ही मस्ती संपविण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ. महाविकास आघाडी सरकार तुम्हाला पसंत होत का? तिघे एकत्र आले पण सत्ता गेल्यावर पण आम्ही घट्टपणे एकत्रच आहोत.’असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दोन्ही मूठी आवळून सभेतील उपस्थितांनी पाठिंबा दिला.

‘वज्रमूठ’ महाविकास आघाडीच्या सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभेला संबोधित केले.

‘गर्दीने मोठ्या प्रमाणावर मैदान व्यापलेलं होत आणि एवढेच लोक बाहेर होते आणि मला वाटत उद्धवजी ठाकरे यांनी अजित दादांनी आणि अशोकराव चव्हाण यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे, तेव्हा वाटत महाविकास आघाडीची ही वज्रमुठ आणखी मजबुतीने येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात घौडदौड करेल. आमची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये कशापद्धतीने येणारे जाणारे वाहन लोक कोणत्या मार्गाने येतील कुठे थांबतील कुठे गाड्या पार्क करतील हे सगळ ठरलं होत ठरलेलं असताना पोलिसांनी १०- १० किलोमीटर लांबपर्यंत वाहन थांबवली आणि १० किलोमीटर पासून पायी जा अशा पद्धतीने लोकांना सांगितलं हे चुकीचे होत आणि म्हणून मला पोलिसांना नाईलाजास्तव माईकहून दम द्यावा लागला. म्हणूनच निवडणुकीला घाबरतायत ना. ठाकरे साहेब नेहमी बोलतायत विधानसभा घ्या महापालिका निवडणुका घ्या जिल्हा परिषद निवडणूक घ्या.’अशी प्रतिक्रिया सभेचे नियोजक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभा संपल्यावर दिली.

‘वज्रमूठ’ महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजी नगर येथे मराठवाड़ा सांस्कृतिक मंडळामध्ये आज २ एप्रिल २०२३ ला झाली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आयोजनात सभेचे आयोजन आणि व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता.

‘वज्रमूठ’ महाविकास आघाडीच्या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री आमदार अ‍ॅड. अनिल परब, सुनिल प्रभू, डॉ. मनिषा कायंदे, उपनेत्या सुषमा अंधारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित होते.