‘सूर्याची पिल्ले’ नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर…

रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार शुभारंभाचा प्रयोग

मुंबई: सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकीच एक वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकली. इतके प्रेम नाट्यरसिकांनी या नाटकावर केले. याच प्रेमाखातर ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. सुबक निर्मित नवनित प्रकाशित प्रस्तुत या नाटकाचा शुभारंभ २२ सप्टेंबरपासून होणार असून याचा पहिला मुंबईतील प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. यानिमित्ताने सूर्य होऊ न शकलेल्या त्याच्या पिल्लांची पोटभर हसवणारी… मनभर सुखावणारी… एक कानेटकरी क्लासिक कॉमेडी! नाट्यरसिकांना परत अनुभवायला मिळणार आहे. हलक्या फुलक्या विनोदातून विचार करण्यास भाग पाडणारे असे हे नाटक आहे.

प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे सुनिल बर्वे, नितीन भालचंद्र नाईक निर्माते आहेत.

या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे म्हणतात, ‘१४ वर्षांपूर्वी मी एका उपक्रम अंतर्गत या नाटकाचे २५ प्रयोग सादर केले होते. त्यावेळी प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, त्यांची पुन्हा हे नाटक रंगमंचावर आणण्याची मागणी, या सगळ्याचाच मान राखत आम्ही ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहोत. खरंतर हे नाटक कोरोनानंतर लगेच आणण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. परंतु आता सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्याने आम्ही पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहोत. हे नाटक जुन्या काळातील असल्याने त्याचा ठहराव जपत, मूळ संहितेसह हे नाटक समोर येणार आहे.’