‘दिल बेधुंद’ १९ मे ला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित !

मुंबई : प्रेमकथा म्हटलं की साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचं एक कथानक, नायक-नायिका, भावना उचंबळून आणणारं संगीत आणि अत्यंत ‘प्रेमळ’ वाटणारे संवाद असा सगळा मसाला आधीच तयार होतो. मग प्रेक्षक हा सगळा मसाला डोक्यात घेऊन चित्रपटगृहात जातात. ‘अरे हे तर आधीच माहिती होतं’, असं म्हणतात आणि परत येतात! प्रेमकथेवर आधारीत तयार होणारे त्याच त्याच धाटणीचे चित्रपटही त्याला काही अंशी कारणीभूत असतात. पण अर्थात, सगळेच चित्रपट असे एकाच मुशीतून काढलेले नसतात बरं! अशीच एका वेगळ्या मुशीतली प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी ‘दिल बेधुंद’ सज्ज झालाय!

आधी टायटल आणि नंतर पोस्टर लाँचला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दिल बेधुंद’चा ट्रेलरही त्याच उत्साहात लाँच झाला. या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर तो व्हायरल होऊ लागला आहे. खरंतर टायटल लाँच झालं, तेव्हाच इथे काहीतरी वेगळं आणि अर्थात बेधुंद करणारं असेल, असा कयास बांधला गेला होताच. चित्रपटाचं पोस्टर आलं तेव्हा आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारा हंसराज जगताप आणि नवोदित अभिनेत्री साक्षी चौधरी यांची जोडी सर्वांसमोर आली. पोस्टरवरून त्यांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार यावर जणू शिक्कामोर्तबच झालं.

चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा हंसराज जगताप याची वेगळी ओळख मराठी प्रेक्षकांना करून देण्याची गरजच नाही. ‘धग’मधल्या त्याच्या अभिनयाला स्पेशल ज्युरी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे मराठी जनमाणसात तो सहज जाऊन पोहोचला. पण त्याच्यासोबत चित्रपटाची अभिनेत्री अर्थात साक्षी चौधरीही ट्रेलरमध्ये दिसत आहे. वयानं हंसराजपेक्षा काहीशी मोठी दिसणारी साक्षी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांच्यात चित्रपटात नेमकी कशी केमिस्ट्री दिसणार आहे, याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. या दोघांसमवेत जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

१९ मे रोजी हा चित्रपट दिमाखात महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ओशियन कर्व्हज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवम पाटील आहेत. संतोष फुंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गुड्डू देवांगन यांनी कथा लिहिली आहे. पवन रेड्डी हे चित्रपटाचे डीओपी आहेत. चित्रपटाचं संगीत स्वप्निल शिवणकर यांचं असून गाणी के. स्वामी यांनी लिहिली आहेत. चित्रपटाच्या पब्लिसिटी डिझाईनची जबाबदारी मुसळे यांनी पार पाडली आहे. रवी पाटील आणि सुयश जाधव यांनी चित्रपटाचं संकलन केलं असून अभिजित कुलकर्णी आणि विष्णू घोरपडे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.