वरळीत आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन !

मुंबई : वरळी येथे आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, विसुभाऊ बापट, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, संतोष माळकर, अशोक शिंदे, ह. मो. मराठे यांच्या कन्या पटवर्धन, शिबानी जोशी, माजी नगरसेवक अरविंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना समितीच्या वतीने आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला.

‘आचार्य अत्रे यांचे ज्यांच्याशी वाद झाले, मैत्री झाली, अशी समकालिनांचे साहित्य नव्या पिढीने आवर्जून वाचलं पाहिजे, अत्रे यांनी माणसं घडविली. मराठामध्ये शिपायापासून कंपोझिटर्सपर्यंत प्रत्येकाला बातमीची जाण होती, आजही ५० वर्षांच्या पत्रकारितेनंतरही आपण मराठातून आलो, अशी ओळख करून देताना आपल्याला अभिमान वाटतो.आज नवे अत्रे निर्माण होण्याची गरज आहे, जेणेकरून इतिहास निर्माण करणाऱ्या व्यक्ती इतिहासातील व्यक्तींनाही मोठ्या करू शकतील,’ असे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सांगितले.