‘कोकण चित्रपट महोत्सव’ ११ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार

मुंबई : कला, संस्कृती आणि परंपरेचं माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत ‘कोकण चित्रपट महोत्सवा’ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी सिंधुरत्न कलावंत मंच सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचं दुसरं वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.

‘विशेष म्हणजे सिंधूरत्न कलावंत मंच संस्थेला हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पत्ररुपी आणि अभिनेते अभिषेक बच्चन यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून इथं आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसंच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील, जेणंकरून तेथील चित्रपट संस्कृती वाढावी ही एकमेव भावना आहे,’ असं पत्रकार परिषदेत अभिनेते आणि अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितलं.

११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोत्सवाचा उद्धघाटन सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांच्या प्रदर्शन आयोजन करण्यात आलं आहे. पुढील तीन दिवस १२, १३ आणि १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.

सिंधूरत्न कलावंत मंच या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे कोकणातील कला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावा हा आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याही वर्षी ११ डिसेंबरपासून रत्नागिरीमधून या महोत्सवाची सुरुवात होत आहे. १६ डिसेंबरला मालवण इथल्या मामा वरेरकर नाट्यगृहात हा भव्यदिव्य महोत्सव रंगणार आहे. कोकणात निसर्ग संपन्नतेसह उत्तोमोत्तम कलाकार-तंत्रज्ञ आहेत त्यांचे कलागुण जगासमोर यावं आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हाच संस्थेचा निर्मळ हेतू आहे. यासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहत स्थानिक कलाकारांचं मनोबल वाढवतील. शिवाय संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवाला चारचाँद लावतील यात काही शंका नाही.

कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असून गेल्यावर्षीप्रमाणेच या ही वर्षी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत.