‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात संपन्न

मुंबई:‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार आदरणीय सुरेश खरे, आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हणाले ‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात ते बोलत होते. गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, अॅड-गुरू भरत दाभोळकर, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी सुरेश खरे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. हा सोहळा दिनांक ६ मे २०२४ ला मुंबईतल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला. गंगाराम गवाणकर, सुरेश खरे यांच्या सन्मानार्थ म्हणाले की, ‘माझ्या कारकीर्दीला सुरेश खऱ्यांच्या नाटकाचा बॅकस्टेज वर्कर म्हणून सुरूवात झाली. पुढे सुरेश खरे आणि मी दोघंही नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही झालो आणि मानाचिच्या लेखन कारकीर्द सन्मानाचे मानकरीही झालो.’

या सन्मान संध्येत, मालिका, नाटक, चित्रपटांच्या प्रशंसनीय लेखनासाठी राकेश सारंग, अनिल पवार, अदिती मारणकर, कौस्तुभ देशपांडे, स्वप्निल जाधव, सचिन जाधव, क्षितिज पटवर्धन, नितीन सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्या बरोबरच अन्य क्षेत्रातल्या प्रशंसनीय लेखनाबद्दल, नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, गेली पंचवीसहून अधिक वर्ष, ‘अर्थ आणि बँकिंग’ सदर लिहिणारे राजीव जोशी, गणेशोत्सव देखाव्यांच्या लेखनासाठी विजय कदम यांनाही सन्मानित करण्यात आलं. मानाचिच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश गारगोटे आणि उमेश ओमाशे यांचाही सन्मान करण्यात आला. आशिष पाथरे यांच्या खुसखुशीत निवेदनानं ही सन्मान संध्या रंगली.

त्या पूर्वी, मानाचि लेखक संघटनेनं आयोजित केलेल्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाच एकांकिकांचं सादरीकरण झालं. नवीन लेखकांना प्रोत्साहन मिळावं, नवनवीन लेखक लिहिते व्हावेत या उद्देशाने मानाचि गेली नऊ वर्ष विविध शिबिरं, परिसंवाद, आणि मार्गदर्शक चर्चासत्रांचे आयोजन करत आली आहे. त्याच उद्देशाने यंदा उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रभरातून १४ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

अंतिम फेरीत संहिता क्रिएशन्स मुंबईच्या, ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. तर बीएमसीसी पुणे यांनी सादर केलेल्या ‘A tale of Two’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा अशी पारितोषिकं पटकावली.

ॲड-गुरु भरत दाभोळकर, लेखक आनंद म्हसवेकर, रामनाथ थरवळ, पुरुषोत्तम बेर्डे, विजय टाकळे, राजीव जोशी, होम मिनिस्टरचे लेखक महेंद्र कदम, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यातील सर्व रोख पारितोषिके मानाचिच्या सभासदांनी आणि सन्मानचिन्हे पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि. नी प्रायोजित केली होती.

गिरीश ओक, ईला भाटे, विश्वास सोहनी, हेमंत भालेकर व शिल्पा नवलकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळी उत्स्फूर्त एकांकिका या नाट्यप्रकारचे जनक सुहास कामत आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर व प्रमोद लिमये यांचा प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला.