स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी घेतला कोलू फिरवण्याच्या अमानवीय शिक्षेचा अनुभव !

मुंबई:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानात कोलूला जुंपून तेल काढण्याची अमानुषीय शिक्षा देण्यात आली होती. यात तात्यारावांना काय यातना भोगाव्या लागल्या असतील, त्याचा अनुभव मला आला. कोलू फिरवताना बेड्यांमुळे पॅंट असूनही कासली गेल्याने होणारा त्रास लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिथे हा भयावह त्रास कसा सहन केला असेल त्याची अनुभूती मिळाली, असे उद्गगार ७२ वर्षांच्या प्रमोद नाईक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात बोलताना काढले.

दादरच्या शिवाजी उद्यानासमोरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दर्शनी भागातच अंदमानच्या तुरुंगाची प्रतिकृती त्या ठिकाणी ब्रिटिशांनी कैद्यांना तेल काढण्यासाठी कोलू ओढण्यासाठी दिलेल्या अमानवीय अशा शिक्षेबद्दल लोकांना प्रचिती यावी, यासाठी ठेवलेली कोलूची प्रतिकृती आहे. या कोलूमधून आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जसे तेल काढण्यासाठी ब्रिटिशांनी अंदमानात जुंपले. उन्हात, पावसात अशी शिक्षा दिली होती. त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रमोद नाईक यांनी सावरकर स्मारकाला त्यासाठी कोलू फिरवण्यास अनुमती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार रविवारी ९ एप्रिल २०२३ या दिवशी त्यांनी सावरकर स्मारकात येऊन हा अनुभव घेतला.प्रथम त्यांनी बेड्या घालून कोलू ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पँटवरूनही त्या बेड्यांमुळे कासले गेल्याने त्यांनी बेड्या काढून कोलू ओढला. त्यासाठी त्यांनी ५ किलो शेंगदाणे घेतले होते. त्यापैकी अडीच किलो शेंगदाणे कोलूमध्ये टाकले. कोलूला असलेला दांडा उचलणेही कठीण असून त्यासाठी दोन माणसे लागतात, हे त्यांना लक्षात आले. तर कोलूद्वारे दोन ते अडीच तास त्यांनी थांबत थांबत कोलू चालवून शेंगदाणे बारीक केले.

हा कोलू सावरकर स्मारकात उन्हात नाही, तिथे थेट ऊन येत नाही. मात्र तरीही या सध्याच्या उन्हाळ्याचा त्रास आणि कोलूची कृती यातून माणसाच्या अंगातून घामाच्या धारा तर निघतातच. पण त्याशिवाय ताकद लावायला लागते, गोल फिरवत चक्करा माराया लागतात. आपण मध्ये मध्ये थांबून हा प्रयत्न केला मात्र नंतर दमल्याने तिथेच पथारी टाकून पडलो. त्यानंतर सावरकर स्मारकाच्या कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये नेऊन विश्रांती घेण्याची व्यवस्था केली. काही काळानंतर विश्रांती घेतली आणि पुन्हा कोलू चालवण्यासाठी आलो पण पाय जडावले होते. यामुळे काम थांबवले. यातून तेल निघण्यासाठी पांढरे नव्हे तर लाल शेंगदाणे वापरावे लागतात, असे तिथे आलेल्या एका तेल घाण्याच्या व्यावसायिकाने सांगितल्याने मी पांढरे शेंगदाणे टाकून जो प्रयत्न केला त्यातून आणखी वेळ जाणार हे नक्की झाले. मात्र त्यानंतर काही आपल्याला कोलू ओढवला नाही, असे सांगत प्रमोद नाईक यांनी तात्याराव सावरकर यांनी अंदमानात किती भीषण आणि भयावह त्रास सहन केला असेल, त्याची कल्पना करणेही कठीण असल्याचे स्पष्ट केले.

प्रमोद नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील असून ते इलेक्ट्रीकल इंजिनीअर आहेत. टाटा पॉवरमध्ये त्यांनी १९७५ ते २०१० या कालावधीत काम केले, तेथे वरिष्ठ अभियंता म्हणून ते निवृत्त झाले. कोलू ओढण्याच्या त्यांच्या या प्रयोगाच्यावेळी स्मारकात येणाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे अनुभवही ऐकले. आपण सावरकर स्मारकात विविध कार्यक्रम पाहाण्यासाठी येत असोत, तेव्हा स्मारकात असलेला हा कोलू एकदा फिरवून पाहिला होता. त्यावेळी हा प्रयोग करून तात्याराव सावरकरांना आलेला अनुभव आपणही किती घेऊ शकतो, ते पाहावे यासाठी हा प्रयत्न होता, असेही त्यांनी सांगितले.