विद्यार्थ्यांसाठी कानमंत्र – स्वतःला पत्रकार म्हणून घडवताना…

मुंबई: मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि. गोखले यांची १०२ वी जयंती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या वतीनं रविवार दिनांक २३ मार्चला सकाळी ११:०० वाजता संस्थेच्या प्रेक्षागारात साजरी झाली. यावेळी माजी वर्ग समन्वयक दिवंगत ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांचेही स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग समन्वयक नम्रता कडू यांनी केले. या समारंभात वर्गाचे वार्षिक पुरस्कार वितरण आणि वर्गाच्या ‘गरवारे दर्पण’ या अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. या समारंभाला साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि त्यांचे ‘विद्यार्थ्यांसाठी कानमंत्र – स्वतःला पत्रकार म्हणून घडवताना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानातून त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता कशी करावी याचा वस्तुपाठ घालणारी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. वर्गाच्या वतीने दरवर्षी वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला युद्ध पत्रकार दिनकर विनायक गोखले पुरस्कार, मुद्रित माध्यम क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला डॉ.अरुण टिकेकर पुरस्कार आणि दृकश्राव्य माध्यमात उत्तम कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्याला विद्याधर गोखले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पत्रकारिता वर्गात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वर्गाची माजी विद्यार्थिनी वनश्री राडये ही यावर्षीची दि. वि. गोखले पुरस्काराची मानकरी ठरली. वर्गाचे माजी विद्यार्थी सुशांत सावंत यांना विद्याधर गोखले पुरस्कार तर प्रविण मरगळे यांना डॉ. अरुण टिकेकर पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत आणि गरवारे व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संस्थेचे अध्यक्ष, कवी आणि ज्येष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार आणि कार्याध्यक्ष प्रविण देशमुख यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी संदीप कुलकर्णी, पत्रकारिता वर्गाचे विषय शिक्षक ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुरेशचंद्र वैद्य,ज्येष्ठ पत्रकार वैभव वझे आणि मुक्त पत्रकार मृदुला राजवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बाळकृष्ण परब, द्वितीय क्रमांक डॉ.अनुप्रिया गायकवाड, तृतीय क्रमांक तनु शर्मा , उत्तेजनार्थ पारितोषिके नंदा कोकाटे आणि दिशिता खाचणे यांना प्रदान करण्यात आले. याचबरोबर मीनल वसमतकर, मिलिंद कल्याणकर आणि प्रदीप कुमार शहा यांचे लेख उल्लेखनीय लेख म्हणून गौरविण्यात आले. वर्गाच्या वार्षिकांकात या सर्वांचे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वर्गाचे विषय शिक्षक डॉ.मुकुंद कुळे, उमेश घळसासी आणि मृदुला राजवाडे यांनी काम पाहिले. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने सर्व पुरस्कार हे पुस्तकांच्या स्वरूपात देण्यात येतात,त्याबाबत सर्व पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आभार मानले.