घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाचे पोस्टर लाँच !

मुंबई:वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड’, ‘लोकशाही’ चित्रपट प्रस्तुत करत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लोकशाही’च्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण जागी झाली होती. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे. नेमके हे आव्हान काय असणार आहे? आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे?, हे गुपित प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ठळक साद घालत आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा ‘लोकशाही’ चित्रपट संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘लोकशाही’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे. “आपण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही अस्तित्वात असताना त्याला ठेच पोहचवणाऱ्या राजकारण्यांचं आणि त्यांच्या भ्रष्ट राजकारणाचं वास्तव प्रखरपणे सांगणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाला नक्कीच तूफान प्रतिसाद मिळेल याची आम्हाला शास्वती आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.