अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा !

मुंबई : अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या शिशुकुल प्राथमिक आणि माध्यमिक विभागांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे सांगणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

शाळेच्या प्रथेप्रमाणे या दिवशी कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा साजरी केली जाते. आपल्या भाषणांतून मुलांनी गुरुपौर्णिमा आणि गुरुंचे महत्व सांगितले. शाळेतल्या मुलांना समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून वेळोवेळी मदत मिळते.आपणही समाजाचे काही देणे लागतो. ‘किती द्या’ या पेक्षा ‘काहीतरी द्या’ आणि हे देणे योग्य गरजवंतांसाठी द्यावे, हा संस्कार शाळेत मुलांवर केला जातो. गुरुपौर्णिमेनिमित्त ठेवलेल्या दान कलशात मुलांनी स्वेच्छेने गुरुदक्षिणा वाहिली. यातून जमा झालेल्या रकमेचा विनियोग सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला देऊन करण्यात येणार आहे.