राज्यातील चार शहरांमध्ये झालेल्या मोडी लिपी स्पर्धेत ८० स्पर्धकांचा सहभाग !

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, जागतिक मोडी लिपी प्रसार समिती आणि शिवराज्याभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनी दिनांक १ मे २०२३ ला महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला एकंदर ८० स्पर्धकांनी आपली उपस्थिती नोंदवली. मोडी लिपिच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते.

या स्पर्धेमध्ये मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात १७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर पुण्यात ११, कोल्हापूर येथे १५ आणि नगर येथे ३७ स्पर्धकांनी सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सोमवारी सकाळी ‘मोडी लिपी स्पर्धा’ संपन्न झाली. दोन भागात ही स्पर्धा झाली. एक सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि दुसरी मोडी लिप्यंतर स्पर्धा अशा दोन प्रकारची ही स्पर्धा होती. मुंबईमध्ये नाशिक आणि रत्नागिरी येथूनही स्पर्धक आले होते. मोडी लिपी प्रचारासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रशिक्षणाचे वर्ग चालवले जातात. या वर्गाचे प्रशिक्षक सुनील कदम, राजेश खिलारी आणि पंकज भोसले आहेत.

‘मोडी लिपी स्पर्धे’च्या निमित्ताने प्रशिक्षक सुनील कदम म्हणाले की, ‘मोडी लिपी ही साडे सातशे वर्षांपूर्वीची आहे. हेमाद्री पंडित यांनी प्रचलित केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो काही पत्रव्यवहार केला गेला. लेखन व्यवहाराची जी लिपी होती, ती राजलिपी ही मोडी लिपी होती. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई आणि इंग्रजांच्या काळातला काही काळ साधारण १९५२ पर्यंत जे काही सरकारी आणि खासगी कागदोपत्री व्यवहार झाले ते मोडी लिपीत लिहिले जात होते. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करावयचा असेल, तर तुम्हाला ही कागदपत्रे वाचावी लागतात, पण त्याकरता मोडी येणे गरजेचे असते. आता मोडी विस्मृतीमध्ये गेली आहे. यासाठी तिचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करणे हे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘मराठ्यांच्या इतिहासाची गुरुकिल्ली म्हणजे मोडी लिपी’ असे म्हणता येईल.’